सिद्धनेर्ली : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महायुतीचाच महापौर होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यागाचीही तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची फळे चाखायची असतील तर महायुतीच्या नियमातच राहावे लागेल. उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. इच्छुक असूनही ज्यांना थांबावे लागेल, त्या सर्वांचा बॅकलॉग आपण भरून काढू, असेही ते म्हणाले.मुश्रीफ म्हणाले, तुम्हा कार्यकर्त्यांच्यामुळेच कागल तालुक्यातून सहावेळा आमदार होण्याचा मान मिळाला आणि मंत्रिपदाची संधी मिळाली. मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम मी केले आहे . 750 हून अधिक देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मला मिळाले. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. येणार्या निवडणुकीत हातात हात घालून काम करा.
कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज पाटील, माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सतीश पाटील- गिजवणेकर, वसंतराव धुरे, नगराध्यक्षा सविता माने, शशिकांत खोत, शीतल फराकटे, बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात कागलच्या नगराध्यक्षा सविता भैया माने, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह नूतन नगरसेवक व भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या अग्निवीर जवानांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार संजय चितारी यांनी मानले.
त्यागाची तयारी ठेवा...!
आपण महायुतीमध्ये आहोत. युतीची बैठक रविवार, दि. 18 होणार आहे. माजी आमदार संजय घाटगे व समरजित घाटगे यांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे, नाराज न होता त्यागाचीही तयारी ठेवा, असेही मुश्रीफ म्हणाले.
धर्मसंस्थेला संरक्षण...!
गडहिंग्लजचे नूतन नगराध्यक्ष महेश तुरबतमठ म्हणाले, ना. मुश्रीफ हे जनसामान्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी 30-35 वर्षांची पुण्याई उभी केली. शेकडो मंदिरे, आश्रम, मठ अशा धर्मस्थळांची उभारणी करून त्यांनी धर्मसंस्थेलाही संरक्षण आणि पाठबळ दिले आहे.