कोल्हापूर : शिक्षक अभियोग्यता परीक्षेने (टीईटी) निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण, बीएलओ नियुक्ती संबंधाने राज्य शासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी शिक्षक सामूहिक रजेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळा बंद ठेवणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यातच पेपरफुटी व शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे, संचमान्यता आदी विषय शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. यासंदर्भात सर्व संघटना प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सर्व शाळा बंद आंदोलनचा निर्णय झाला. याअनुषंगाने विविध शिक्षक संघटनांनी दि. ३० रोजी शासनाला नोटीस दिली आहे. आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, राज्य खासगी शिक्षक सेवक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिली.