कोल्हापूर : गतवर्षीच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता म्हणून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसे पत्र सहकार विभागाने साखर आयुक्तांना दिले. आता कारखानदारांनी दुसरा हप्ता जमा करावा; अन्यथा संघर्षाला सज्ज राहावे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
गत हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांपेक्षा कमी दर दिला, त्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये दुसरा हप्ता द्यावा. ज्या कारखान्यांनी ३ हजारांपेक्षा जादा दर दिला आहे, त्यांनी प्रतिटन ५० रुपये दुसरा हप्ता द्यावा, यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री शिंदे यांना जिल्हा दौऱ्यात काळे झेंडे दाखवले होते. यानंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याही दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दि. २५ रोजी साखर आयुक्तांना विशेष बाब म्हणून ही रक्कम देण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे परिपत्रक काढले आहे.