शिरढोण : पुढारी वृत्तसेवा
शिरढोण, टाकवडे (ता.शिरोळ) गावात ‘लम्पी‘ आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. १० जनावरे बाधित झाली असून, तीन जनावरे दगावली आहेत. शिवाय शिरढोण येथे फिरस्त्या चार जनावरांना लम्पिची लागण झाली असल्याने पशुपालन करणाऱ्या लोकांत चिंतेचे वातावरण आहे. या फिरस्त्या जनावरांवर उपचार करण्याची गरज आहे.
पशुसंवर्धन अधिकारी शरद सव्वाशे यांनी लागण झालेल्या जनावरांना तातडीने लसीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र शिरढोण येथील फिरस्त्या जनावरांना लसीकरण करणे अशक्य असल्याने ग्रामपंचायतीने या जनावरांना एका जागी बांधायची सोय करावी. तरच यांच्यावर योग्य उपचार केले जातील अशी मागणी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. दीड वर्षापूर्वी आलेल्या लाटेत तब्बल १२८० जनावरे मृत्युमुखी पडल्याने ‘लम्पी’चा ताप गायींना आला असला तरी घाम मात्र पशुपालकांना फुटला आहे.
गायवर्गीय गाय, बैल, वासराला ‘लम्पी’ची लागण होते. म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. हा चर्मरोग असला तरी संसर्गाने झपाट्याने पसरतो. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२२ पासून लम्पीची लागण झाली आणि वर्षभर शेतकऱ्यांचे गोठे मोकळे झाले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक जनावरांना त्याची लागण झाली, त्यातील १२८० जनावरे दगावली होती. या कालावधीत राज्य शासन व ‘गोकुळ’ने प्रतिबंधक लसीकरण केले. सर्व जनावरांना लसीकरण केले तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही झाला होता. आता ‘लम्पी’ने नव्याने डोके वर काढले असून शिरोळ तालुक्यात बहुतांशी गावात जनावरे बाधित झाली आहेत. आता ‘लम्पी’ने नव्याने डोके वर काढल्याने शेतकरी धास्तावला आहे.