शिरोळ : केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी लोक करीत आहेत. राज्यात पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 42 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. ज्या जागा मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच लढविणार, असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालयात शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात मंत्री पाटील दूरध्वनीवरून बोलत होेते. यावेळी भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खा. धनंजय महाडिक म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजप भक्कम असल्याने येत्या निवडणुकीत भाजप सर्व ताकदीने निवडणुकीला सामारे जाणार आहे.
गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुराच्या काळात गुरुदत्त शुगर्सने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. नदीपलिकडील सात गावांसाठी ना. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आलास ते अकिवाटदरम्यान पुलासाठी 23 कोटींचा निधी मंजूर झाला. युती न झाल्यास आमची स्वबळाची तयारी आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, जयसिंगपूरनंतर शिरोळच्या नगराध्यक्षा भाजपच्याच होणार आहेत. माधवराव घाटगे चाणक्यनीतीचे आहेत. आ. अशोकराव माने, माधवराव घाटगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्याची प्रेरणा दिली आहे.
यावेळी रजनीताई मगदूम, ‘गुरुदत्त’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माजी नगरसेवक उदय डांगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, डॉ. अरविंद माने, अनिल डाळ्या, रमा फाटक, महेश देवताळे, शिवाजीराव माने-देशमुख, वर्षा पाटील, मुकुंद गावडे, शिवाजी जाधव-सांगले, संभाजी भोसले उपस्थित होते.