कोल्हापूर : लिंगायत समाजास अल्पसंख्याकचा दर्जा द्या आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजास द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी समस्त लिंगायत समाजाने एल्गार करीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असणारे आंदोलन सायंकाळी साडेपाच वाजता स्थगित करण्यात आले. आपल्या न्याय हक्कांसाठी हजारो समाजाबांधव एकवटून रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण असेंब्ली रोड गर्दीने फुलून गेला होता. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली हाती. तरीही हजारो समाजबांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.
सकाळी दहा वाजल्यापासून समाजबांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे असेंब्ली रोड वाहतुकीस बंद केला होता. तर अजिंक्यतारा कार्यालय ते राजर्षी शाहू रक्तपेढी हा मार्ग बसेस आणि वाहनांनी व्यापला होता. जय बसवेशा, महाराष्ट्र देशा, भारत माता की जय, लिंगायत समाजास न्याय मिळालाच पाहिजे आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी वूडन संगम मठाचे मृत्युंजय महास्वामी, अलमप्रभू मठाचे बसूकुमार स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार शिवाजी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
आमदार शिवाजी पाटील यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत प्रश्न धसास लावण्याची ग्वाही दिली. २०१३ मध्ये केवळ आश्वासन मिळाले. त्यामुळे आता लेखी द्या, असा आग्रह धरल्यानंतर आमदार पाटील यांनी तेव्हा फडणवीस नव्हते आता आहेत, असे सांगितले. या आंदोलनात इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे, प्रशांत शहापुरे, नितीन पाटील, दत्त उद्योगसमूहाचे गणपतराव पाटील, रजनीताई मगदूम, सरलाताई पाटील, वैशाली पाटील, स्मिता तेलनाडे, बी. एस. पाटील, चंद्रशेखर तंबाखे यांच्यासह हजारो समाजबांधव ठाण मांडून बसले होते.
मंडप घालण्यास पोलिसांचा आक्षेप
आंदोलनास परवानगी नसल्याने आंदोलनस्थळी मंडप घालण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे समाजबांधवांनी थेट रस्त्यावर ठाण मांडून आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण असेंब्ली रोड गर्दीने फुलला. पांढरी टोपी आणि गळ्यात भगव्या रंगाचा धर्मध्वज घेऊन आंदोलक सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर भगवामय बनला होता.