कोल्हापूर : श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे गायमुख परिसरातील आंब्याच्या झाडावर बुधवारी (दि. 1) दुपारी वीज कोसळली. यामध्ये झाडाखाली उभारलेले 7 भाविक जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. दरम्यान, दुपारी पावसाचे वातावरण झाले. सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे काही भाविक गायमुख परिसरातील आंब्याच्या झाडाखाली अडोशाला उभारले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली. यामध्ये कागल तालुक्यातील अर्जुनी गावचे भीमराव पांडुरंग देसाई (वय 52), राजाराम गुंडू पेडणेकर (62), पांडुरंग शंकर पेडणेकर (43), जयसिंग बाबुराव देसाई (72), प्रथमेश विनायक देसाई (20), शिवाजी धोंडिराम देसाई (47) व चिमगाव येथील विठ्ठल लक्ष्मण केंगार (42) हे जखमी झाले. जखमींना प्रशासन व नागरिकांच्या मदतीने तातडीने 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले.
जखमी 12 तास निरीक्षणाखाली
जखमींवर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरीही सर्व जखमींना 12 तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकार्यांनी सीपीआरमध्ये जखमींची विचारपूस केली. तसेच, भाविकांना पावसाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले.