एकनाथ नाईक
कोल्हापूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खत विक्रेते, बियाणे, कीटकनाशके विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. कृषी विभागाने धडक कारवाई करत ५३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले असून, बियाणे, खते, कीटकनाशके २११ केंद्रांना विक्री बंद आदेश दिले आहेत. न्यायालयात ९ कृषी केंद्रांच्या विरोधात, तर पोलिसांत २ तक्रारी दाखल आहेत.
भेसळयुक्त खतांचे नमुने अप्रमाणित, बियाणे, कीटकनाशकांमध्ये भेसळ तसेच अनेक तफावती आढळल्याने संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खत कंपन्या आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खत मिळावे, यासाठी कृषी विभाग आक्रमक झाला आहे. जिल्ह्यात बोगस खत आणि बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. या मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बियाणांच्या ४०, खतांच्या १५६, तर कीटकनाशकांच्या १५ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदीचा आदेश कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात बोगस खतांवर कारवाई होत असली, तरी बोगस बियाणांची विक्री राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर वॉच ठेवून कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
निकृष्ट खतांमुळे शेती उद्ध्वस्त
निकृष्ट खतांमुळे जमिनीचा कस वेगाने कमी होतो. पीक उत्पादनात मोठी घट येते. शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि उत्पादन घटते. अनेकदा संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. खत खरेदी अधिकृत परवाना असल्याची खात्री करा. खतांच्या, बियाणांच्या गोणीवरील उत्पादक, उत्पादन तारीख, वजन आणि गुणवत्ता तपासा. संशय आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.
निकृष्ट खते, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. दोषींवर थेट कारवाई करणार. शेतकऱ्यांना बोगस खते, बियाणे विक्री निदर्शनास आल्यास कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.नामदेव परीट (कृषी उपसंचालक, कोल्हापूर )