सरूड : शाहूवाडी तालुक्यातील मौजे पिशवी येथे बिबट्याने हल्ला चढवून पाळीव दोन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना गुरुवारी (ता.५) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत आनंदा शामराव पाटील या शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावाच्या माथ्यावर वनविभागाचे क्षेत्र असून पिशवी गावासह, खोतवाडी परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात बिबट्याच्या दहशतीची छाया पसरल्याचे चित्र आहे.
दरम्यान, स्थानिक पोलीस पाटील दिपक पाटील यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर बांबवडे परिमंडळ वनाधिकारी नाथा पाटील यांनी वनरक्षक सुशील शिरसाट, वनसेवक अमर कुडीत्रेकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आनंदा पाटील या शेतकऱ्याच्या गवत, तसेच तरट्याने बंदिस्त खोपट्यातील बांधलेल्या दोन शेळ्यांचे अर्धवट खाल्लेले छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आले.
एकंदरीत घटना पाहता बिबट्याने खोपटात शिरून शेळ्यांवर हल्ला चढवून खोपटाबाहेर ओढून नेऊन दोन्हीही शेळ्यांचा फडशा पाडल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या पाथकाने या घटनेचा पंचांसमक्ष पंचनामा केला असून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारी सानुग्रह मदत मिळवून देण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे बांबवडे परिमंडळ वनाधिकारी नाथा पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, नागरीवस्तीजवळ येऊन पाळीव शेळ्यांना हिंस्र बिबट्याने लक्ष केल्यामुळे वनविभाग अधिक सतर्क झाला आहे. वरीष्ठांच्या सूचनेनुसार बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. रात्री अपरात्री नागरिकांनी बिबट्याच्या संचार क्षेत्रात जाऊ नये, तसेच विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहनही वनाधिकारी नाथा पाटील यांनी परिसरातील लोकांना केले आहे.