कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसात गळती लागली होती. त्याचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला. मंदिरात सध्या सुरू असलेल्या मंदिर जतन संवर्धनाचे निकृष्ट काम की अन्य कारणांनी ही गळती लागली, याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, असे शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली होत असले तरी ते योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप केला जात आहे. संपूर्ण मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य नक्षीकाम, विविध कलाकुसर, मूर्तींचे मूळ रूप जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामात ग्राईंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मूळ सौंदर्याला बाधा येण्याची भीती आहे. या कामांमुळे मंदिरात गळती लागल्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. यावेळी मंदिरात शनिमंदिराकडील दरवाजापासून ते बाहेर पडणाऱ्या दरवाजापर्यंत सर्व खांबावरून मोठ्या प्रमाणात पाणी ठिपकत होते. या ठिकाणी बादलीही ठेवण्यात आली होती. या गळतीने मंदिरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावरही पाणीच पाणी झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. आपल्याला मिळालेल्या या व्हिडीओबाबत अधिक माहिती घेतली जात असून प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला जाईल, असेही सुर्वे यांनी सांगितले.