कोल्हापूर : पंचगंगेच्या काठी जन्मलेल्या कोल्हापूरकरांमध्ये रांगड्या मातीची रग व धग दोन्ही आहे. महाराष्ट्र गीत कोल्हापूरच्या लोकांना तंतोतंत लागू होणारे आहे. कै. कृष्णात कोंडेकर यांनी कष्टातून शिक्षण संस्था सुरू करून ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचवली, असे गौरवोद्गार दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्था, श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूल (गिरगाव, ता. करवीर) येथे कृष्णात ज्ञानदेव कोंडेकर यांच्या अर्धपुतळा अनावरणप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. योगेशकुमार गुप्ता, माजी खा. संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. जाधव म्हणाले, कृष्णात कोंडेकर गरिबीतून दिवस काढत स्वकर्तृत्वाने मोठे झाले. त्यांचा धाडसी स्वभाव व दातृत्वामुळे ते पंचक्रोशीत परिचित होते. देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या वर पोहोचली असून शिक्षण व साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नसून शिक्षणामुळे मिळालेली बौद्धिक संपत्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कृष्णात कोंडेकर यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्था सुरू केल्याने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कृष्णात कोंडेकर यांनी राजकारण, समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्या काळातील त्यांनी केलेली आंदोलने गिरगावच्या विकासासाठी महत्त्वाची ठरली. त्यांच्या कार्याचा वारसा प्रताप कोंडेकर यांनी पुढे चालवावा. मधुरिमाराजे या कोंडेकर कुटुंबीयांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाल्या.
पुतळा अनावरण समितीचे अध्यक्ष प्रताप कोंडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, सुरेश हाळवणकर, व्ही. बी. पाटील, कर्नल माधव वेशवीकर, बंडोपंत कोटकर, क. म. शहा, कर्नल विजयसिंह गायकवाड, ए. वाय. पाटील, सुरेंद्र जैन, राजू लिंग्रस, डॉ. संदीप पाटील, सुरेश कुराडे, जयेश कदम, भाजचे राहुल चिकोडे, संग्राम सावंत, उपाध्यक्ष माधवराव कुरणे, मुख्याध्यापक के. बी. चव्हाण, रूपेश पाटील आदी उपस्थित होते.