एकनाथ नाईक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’तून प्रवास अधिक सुलभ आणि कॅशलेस झाला आहे. त्यासाठी ‘एनसीएमसी' अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार ६९१ नागरिकांनी हे कार्ड काढले असून त्यापैकी ३ लाख ३६ हजार ६८० कार्डधारक सक्रिय आहेत; मात्र कार्डचा वापर वाढत असताना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी, रिचार्जबाबतचा संभ्रम आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखीही वाढली आहे.
एसटी प्रवासात सुट्ट्या पैशांची अडचण टाळण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरत आहे. महामार्गावरील वाहनांसाठी असलेल्या ‘फास्टॅग ‘ प्रमाणे या कार्डचा वापर करता येतो. प्रवासासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कार्डमधील रकमेच्या माध्यमातून तिकीट काढता येते.
कार्ड रिचार्जचे तीन पर्याय
एनसीएमसी कार्ड रिचार्ज करणे आता सोपे झाले आहे. प्रवाशांना फोन पे, अधिकृत केंद्र आणि बस वाहक अशा तीन पर्यायांद्वारे कार्ड रिचार्ज करता येते. ज्या अधिकृत एजंट अथवा केंद्रातून कार्ड काढले आहे, त्या ठिकाणी मशिनद्वारे कार्ड रिचार्ज करून घेता येते.
बस वाहकाकडून रिचार्ज
प्रवासादरम्यान बसमधील वाहकाकडे असलेल्या मशिनद्वारेही कार्ड तत्काळ रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिकृत एजंट, बस वाहकाकडे रोख रक्कम देऊन कार्ड रिचार्ज केल्यानंतर प्रवाशांनी छापील पावती घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्यात काढलेली कार्ड संख्या ४, ५४, ६९१
सक्रिय कार्ड संख्या
३, ३६, ६८०
जिल्ह्यातील कार्ड
काढण्याची केंद्रे - २३२
सध्या सुरू केंद्रे - १९८
शहरातील केंद्रे - ३२