Panchganga River, Rain Update
कोल्हापूर : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. शनिवारी पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्याकडून शिवाजी पुलाकडे जाणार्‍या रस्त्याला लागले.  Pudhari News network
कोल्हापूर

Kolhapur | पूर पातळीत संथगतीने वाढ; पंचगंगा 36 फूट 6 इंचांवर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू आहे. दिवसभर कोसळणार्‍या पाऊसधारांमुळे नागरिकांची त्रेधा उडत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर), पडळ, बाजारभोगाव, मलकापूर, आंबा, कडगाव, चंदगड, नारंगवाडीसह 13 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. यामुळे पंचगंगा नदी रात्री 9 वाजता 36 फूट 6 इंचांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम असला, तरी पंचगंगा नदीच्या पूर पातळीत संथगतीने वाढ सुरू आहे. गायकवाड वाड्याकडून शिवाजी पुलाकडे जाणार्‍या रस्त्याला पंचगंगेचे पाणी लागले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. दरम्यान, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. शहरात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी कोगे-कुडित्रे पुलावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. 24 तासांत पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक (57.4) पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रातही अतिवृष्टी सुरूच आहे. राधानगरी (119 मि.मी.), वारणा (66), दूधगंगा (94), कासारी (113), कडवी (117), पाटगाव (134), चित्री (105), जंगमहट्टी (71), घटप्रभा (183), जांभरे (100), आंबेओहोळ (65), सर्फनाला (165), कोदे (107) येथे अतिवृष्टी झाली आहे. चंदगड तालुक्यातील पाटणे लघू प्रकल्प दुपारी 4 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. राधानगरी धरण 72.68 टक्के भरले असून, धरणातून 1450 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

22 कच्च्या घरांची अंशतः पडझड

जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालानुसार, 24 तासांत 33 खासगी मालमत्तांचे 13 लाख 24 हजार रुपयांचे नुकसान झाले. 23 कच्च्या घरांची, तर 2 गोठ्यांची अंशतः पडझड झाली. पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, शिंगणापूर, हणमंतवाडी, केर्ली, रजपूतवाडी, वडणगे या गावांतील पूरप्रवण भागातील ग्रामस्थांनी स्थलांतराची तयारी ठेवली आहे.

पंचगंगा पाणी पातळी 36 फूट 6 इंचांवर स्थिर

पंचगंगेच्या पाणी पातळीत शुक्रवारी झपाट्याने वाढ झाली. पावसाचा जोर असला, तरी शनिवारी पाणी पातळीत संथगतीने वाढ होत होती. सकाळी 7 वाजता पंचगंगा 35 फूट 5 इंचांवर होती. त्यानंतर दुपारी चार वाजता पाणी पातळीत सात इंचांची वाढ घोऊन पातळी 36 फूट 2 इंचांवर पोहोचली होती. सायंकाळी 7 वाजल्यापासून पंचगंगेची पाणी पातळी 36.5 फुटांवर स्थिर होती. रात्री 9 वाजता पाणी पातळीत 1 इंचाची वाढ होऊन पातळी 36 फूट 6 इंचांवर पोहोचली होती.

79 बंधारे पाण्याखाली

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, रुकडी, कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, करडवाडी, साळगाव, निलजी, ऐनापूर, गिजवणे, दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकूड, बाचणी, भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे, सरूड, चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव खोची, शिगाव, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, शिरगाव, तारळे, कळे, शेणवडे, मांडुकली, वेतवडे, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी 1, नवलाचीवाडी 2, सुळे, पनोरे, आंबर्डे, हिंडगाव, कानडे सावर्डे, अडकूर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली, पिळणी, बीडसह 79 बंधारे पाण्याखाली आहेत.

SCROLL FOR NEXT