धामणी खोऱ्यात पाणीटंचाई 
कोल्हापूर

कोल्‍हापूर : पाटबंधारे प्रकल्‍पाअभावी धामणी खोऱ्यात पाणीटंचाई; मातीच्या बंधाऱ्यांनी पाणी अडवण्यास सुरूवात

निलेश पोतदार

म्हासुर्ली : पुढारी वृत्तसेवा अधिक पावसाच्या पट्टयात असूनही पाटबंधारे प्रकल्पा अभावी धामणी खोरे आणि पाणीटंचाई हे आजवर घट्ट जुळलेले समिकरण आहे. जरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असली तरी त्या पाणीटंचाईशी दोन हात करण्यासाठी शेतकर्‍यांना नोव्हेंबर, डिसेंबर पासूनच कंबर कसावी लागते. याची प्राथमिकता म्हणजे सध्या नदीवर समांतर पद्धतीने माती बंधारे बांधून टप्प्याटप्याने पाणी अडवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांकडून चालू आहे. हे केवळ आजकालचे चित्र नसून, हि अनेक दशकांची अव्याहत चालत आलेली परंपरा आहे. यात पैशाचा, श्रमाचा आणि वेळेचाही अपव्यय होत आलेला आहेच, पण भूपृष्टाच्या हाणीबरोबर नदीच्या अस्तित्वावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील नदीखोऱ्यांत उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यांनुसार शेतीत क्रांती झाली अन् शेतकऱ्याच्या जीवनात सुबत्ता आली. सन २००० साली धामणी मध्यम प्रकल्प कामाचा शुभारंभ झाला आणि येथूनच येथील जनतेच्या आशा – अपेक्षांचा प्रवास सुरू झाला. धामणीतून आज पाणी येईल, उद्या येईल त्या पाण्यावर दुखः दारिद्र्यात रापलेले संसार सुखाने फुलतील हिच ती भाबडी आशा होती. आज तब्बल बावीस वर्षांचा काळ उलटला. धामणी प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेलेले नाही. त्यामुळे जी लोकांत आशा होती ती आजही आशाच बनून राहिली आहे. प्रकल्पाअभावी उन्हाळ्यातील बहुतांश दिवस लोकांना भयाण पाणीटंचाईशी मुकाबला करावा लागतो. यात जगण्याची प्रचंड वाताहत होतेच पण पाणीटंचाई पूर्वी जे पाणी लोकांना , शेतीला, गुराढोरांना आधार ठरावे म्हणून संचयित केले जाते ते साठवण्यासाठी मोठ्या संघर्षाची तयारी ठेवावी लागते.

अगदी पाण्याच्या थेंबाचेही महत्व असणाऱ्या धामणी खोऱ्यात नदीवरील निकामी स्वरूपाच्या बंधार्‍यांत साठवलेल्या पाण्याचा झपाट्याने निचरा होतो. यास अटकाव व्हावा व पुरेपूर पाणी साचून राहावे म्हणून शेतकऱ्यांना या बंधाऱ्याच्या आतिल बाजूस स्वखर्चातून मातीचा बंधारा बांधावा लागतो. एकदोन नव्हे तर तब्बल आठ नऊ ठिकाणी असे बंधारे बांधले जातात. एका बंधाऱ्यासाठी लाखाच्या पटीत खर्च येत असतो. दरवर्षी एकूणच बंधाऱ्यांवर लाखो रुपयांच्या खर्चाचा नाहक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. एकिकडे लोकांच्या पैशाची हाणी होत असली तरी दुसरीकडे पर्यावरणालाही बाधा पोहचत आहे. एका बंधाऱ्या कामी शेकडो ट्रेलर दगड माती वापरावी लागते. यात भूपृष्टाची झीज होत आली आहेच पण हाच बंधारा पावसाळ्याच्या तोंडावर नदीचा मार्ग मोकळा करण्यासाठी फोडुन द्यावा लागतो. त्यामुळे दगड मातीचा खच पडुण नदीचे पात्र पूर्ण उथळ बनत चालले आहे. त्यामुळे नदीच्या अस्तित्वासमोरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक वर्षांची शोकांतिका, लोकांमागील दृष्टचक्र कायमस्वरूपी संपुष्टात येण्यासाठी येथील धामणी प्रकल्पाचे पूर्णत्वाकडे जाणे गरजेचे बनले आहे.

सन १९९६ मध्ये प्रकामकामाला मंजुरी मिळाली. लोक चळवळीतून पन्हाळा बावड्याचे तत्कालिन आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून सन २००० मध्ये प्रकल्पकामास सुरूवात झाली. प्रकल्पाची ३.८५ टि. एम.सी.साठवण क्षमता असली तरी प्रकल्पा समोर उभे असणारे संभाव्य अडथळ्यांचे डोंगर पाहता सुरूवातीला एक दोन वर्षात सव्वा टि.एम.सी. पाणी अडवून येथील ओसाड शेती पाणीदार करण्याची तर उर्वरित काम टप्याटप्याने पूर्ण करण्याची त्यांची दुरदृष्टी होती. पण पूर्ण प्रकल्पाचीच उभारणी व्हावी या लोकांच्या अतिमहत्वकांक्षेच्या मागणीतून पूर्ण प्रकल्पाची उभारणी होवू लागली. येथूनच प्रकल्पातील मोठमोठ्या अडथळ्यांची मालिका सुरु झाली. सुरूवातीलाच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात बुडीत होणाऱ्या वनक्षेत्राचा अगदी जटील मुद्दा पुढे आला. हा न सुटु पाहणारा प्रश्न आ. कोरे यांनी अत्यंत शिताफिने व धिरोदात्तपणातून सोडवत प्रकल्प कामाचा मार्ग सुकर केला. पण पुढे पुनर्वसनाचा प्रश्न, निधीचा प्रश्न आदी प्रश्नांनी प्रकल्पाचा आज बाविसाव्या वर्षापर्यंत श्वास गुदमरूण धरला.

दरम्यान आमदार पी.एन.पाटील, मा.आ. चंद्रदिप नरके यांचेही प्रयत्न प्रकल्पाच्या पथ्यावर पडले. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची मागील सात आठ वर्षातील कामगिरी प्रकल्पाच्या अधिक पथ्यावर पडली. त्यांच्या प्रयत्नातून गतवर्षी प्रकल्पकामाचा नव्याने शुभारंभ होवून कामही चालू झाले. लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनही येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर चांगले काम करत असून, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांनी पुन्हाही गुंता वाढत चालला असून, कामास वारंवार मरगळ प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०२४ ला प्रकल्पात पाणी अडवण्याचा मुहुर्त साधला जाणार का ? याकडे संपूर्ण भागाचे लक्ष लागुन आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT