जयसिंगपूर : उदगाव (ता.शिरोळ) येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वहसातीमधील २४ फेब्रुवारी रोजी प्रोसेस कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र हा निर्णय डावलून मे अरिंहत यॉर्न प्रोसेस सुरूच होते. अखेर शनिवारी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व अर्जुनवाड ग्रामस्थांनी एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांना कंपनी सील करायला लावली. शिवाय पुन्हा बेकायदेशीरपणे कंपनी सुरू केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
उदगाव येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वहसातीमधील प्रोसेसचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने अर्जुनवाड ग्रामस्थांनी २३ फेब्रुवारीला प्रदूषण अधिकाऱ्यांना कोंडून घालून आंदोलन केले होते. त्यानंतर २४ फेब्रुवारीला उदगाव औद्योगिक वसाहतीतील प्रोसेस बंद करून एटीपी प्रकल्पाच्या पाईप्स फोडून टाकल्या होत्या. त्यानंतर प्रोसेस मालकानी या एमआयडीसीतील सर्व प्रोसेस बंद करत असल्याचे पत्र दिले होते. तरीही मे अरिंहत यॉर्न प्रोसेस हे सुरूच होते. ही बाब अर्जुनवाड ग्रामस्थांच्या लक्षात आली होती.
त्यानंतर शुक्रवारी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व ग्रामस्थ यांनी कंपनी सुरू असल्याची प्रात्यक्ष पाहणी केली होती. शनिवारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन यांना धनाजी चुडमुंगे व ग्रामस्थांनी याबाबतचा जाब विचारला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीच्या चेअरमन मेघा पाटील, संचालक दिलीप पाटील कोथळीकर, मॅनेजर ए.आर.मुल्ला यांनी शनिवारी कंपनीला टाळे ठोकून सील केले. व प्रोसेस बंद ठेवण्याचा आदेशही दिला. यावेळी राकेश खोत, अमोल लाटवडे, प्रकाश झांबरे, रमेश झाबरे, उद्धव मगदूम व नागरिक उपस्थित होते.