राशिवडे : तरसंबळे (ता. राधानगरी) येथील विवाहिता रूपाली प्रवीण गुरव (वय 28) हिचा रविवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी रूपालीचे वडील पांडुरंग गुरव यांनी मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पती प्रवीण गुरव याला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राधानगरी येथील पांडुरंग गुरव यांची कन्या रूपाली हिचा विवाह 2018 मध्ये तरसंबळे येथील प्रवीण गुरव यांच्याशी झाला होता. विवाहानंतर माहेरहून दहा तोळे सोने आणावे, तसेच माहेरील शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी, अशी मागणी पती व सासू-सासऱ्यांकडून केली जात होती. यातून रूपालीचा छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
रूपालीला दोन लहान मुले असून, सासरकडून होणाऱ्या त्रासाची ती वारंवार माहेरी माहिती देत होती. या त्रासाला कंटाळून ती माहेरीच राहत होती, यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा बैठकाही झाल्या; परंतु छळ व मारहाण सुरूच असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीही रूपालीने आई-वडिलांना मारहाणीची माहिती दिली होती. त्यानंतर ती चार दिवस माहेरी राहून शनिवारी मुलांच्या ओढीने पुन्हा तरसंबळे येथे सासरी गेली होती.
दरम्यान, रविवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिस व ग््राामस्थांच्या मदतीने रूपालीचा मृतदेह राधानगरी ग््राामीण रुग्णालयात दाखल केला; परंतु घटनेचा विषय गंभीर झाल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठवण्यात आला या प्रकरणी निःपक्षपातीपणे तपास होऊन मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी रूपालीच्या आई-वडिलांनी केली आहे. शवविच्छेदन व मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास राधानगरीचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.