राशिवडे, पुढारी वृतसेवा : भोगावती साखर कारखान्यामध्ये पाच वर्षामध्ये टेंडरचा मंडप कधीच बघितला नाही, केलेल्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठीच बिनविरोधची वल्गना केली जात आहे, खरंच मिटविण्याची इच्छा असेल तर सन्मानाने समान वाटा मिळाला पाहीजे. अन्यथा आमची निवडणुक लढविण्याची तयारी आहे,असा इशारा भाजपचे करवीर तालुकाध्यक्ष,भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी दिले. ते परिते येथे राधानगरी, करवीर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.अध्यक्षस्थानी व्ही.टी.जाधव होते.
पाटील पुढे म्हणाले की, भोगावती कारखाना वाचला पाहीजे ही भाजपचीही भुमिका आहे. भोगावतीवर दिवसाला पंधरा लाखाचे कर्जापोटी व्याज पडत आहे.खरोखरच कारखाना वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर सन्मानपुर्वक सतेचा वाटा मिळाला पाहीजे. तुमच्या कारभारावर आम्ही पांघरूण घालण्यासाठी एकत्र येणार नाही.तर प्रसंगी भाजप समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुर्ण ताकदीने निवडणुक रिंगणात उतरेल.यावेळी भाजपचे जिल्हा सहकार सेल अध्यक्ष नामदेवकाका पाटील म्हणाले की,भाजपला वगळुन भोगावतीची निवडणुक बिनविरोध शक्य नाही. राज्यात, केंद्रामध्ये भाजपची सता आहे,भोगावतीला अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. स्वागत अरुण पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक डाँ.सुभाष जाधव यांनी केले.
यावेळी भोगावतीचे संचालक दता मेडशिंगे, राधानगरी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा मिनाक्षी नकाते, आनंदराव चौगले,अंकुश पाटील कुर्डु, तानाजी जाधव बाचणी,दता शेळके शेळकेवाडी,सुभाष पाटील परिते,महिपती पाटील देवाळे,हरिष मगदुम राशिवडे यांच्यासह भोगावती पंचक्रोशीतील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अजित चव्हाण यांनी आभार मानले.