कोल्हापूर

Kolhapur Soldier Death | सुळंबी येथील जवानांचा अरुणाचल प्रदेशमध्ये अपघाती मृत्यू

सागर शंकर पाटील यांच्या अकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

सरवडे : सुळंबी (ता.राधानगरी) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील (वय.४३) यांचे पालम अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना अपघाती निधन झाले. पाटील हे गेले तीन वर्षे अरुणाचल प्रदेश येथे आपले कर्तव्य बजावत होते. नुकतीच त्यांची जम्मू काश्मीर येथे बदली झाली होती. तेथे हजर होण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुली भाऊ बहीण असा परिवार आहे.

अरुणाचल प्रदेश येथील १३८ पालम बटालियन येथे घनदाट जंगल परिसरात आपली सेवा बजावत असताना गुरुवार (दि.९) रोजी पहाटे त्यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु मुळगावी शुक्रवारी पहाटे ही बातमी मिळाली. या बातमीमुळे गाव व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

सागर पाटील हे सन २००४ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाले होते. लखनौ, येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या बावीस वर्षांत त्यांनी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावली असून त्यांच्या अकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण सोळांकूर हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगूड येथे झाले असून घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते केंद्रीय राखीव दलात भरती झाले होते.

सागर पाटील यांचे पार्थिव पालम येथून गुवाहाटी तेथून विमानाने पुणे व पुण्याहून सुळंबी येथे मुळ गावी शनिवार (दि.११) सकाळी नऊ वाजता शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT