Shirol Farmland Water Drainage Issue Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोणात पाण्याच्या निचऱ्याअभावी शेकडो हेक्टर शेती धोक्यात; पिके कुजण्याची भीती

शिरढोण–नांदणी मार्गालगत पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली; चर खोदण्याची शेतकऱ्यांची मागणी, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Shirol Farmland Water Drainage Issue

शिरढोण : शिरढोण–नांदणी मार्गालगत पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून ऊस, सोयाबीन, भाजीपाला आणि अन्य नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दरवर्षी उद्भवत असून अनेक शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यालगत पावसाचे पाणी साचून ते थेट शेतात शिरते. परिणामी पिके दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने कुजून जात असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सतत पाणी साचत राहिल्याने जमिनीची सुपीकताही कमी होत असून काही ठिकाणी शेती कायमची नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा करण्यासाठी चर नसल्याने ही समस्या कायम आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शिरढोण–नांदणी मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने चर खोदून पावसाच्या पाण्याचा निचरा जवळील ओढ्यात करावा. पाणी साचून शेतीचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- प्रमोद कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष, शिरढोण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT