बिरू व्हसपटे
शिरढोण : शिरढोण–टाकवडे–कुरुंदवाड या २०० क्रमांकाच्या महामार्गावरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामात पुरपट्ट्यात टाकण्यात आलेला भराव आगामी पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सुमारे २० कोटी रुपयांच्या या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केवळ मुरुमाचे थर टाकून भराव करण्यात आला असून त्यावर कोणत्याही प्रकारचे पिचिंग किंवा संरक्षणात्मक बांधकाम करण्यात आलेले नाही.
नागरिकांच्या मते, हा भराव आतून पोकळ असून मुसळधार पावसात तो सहज वाहून जाण्याची शक्यता आहे. भराव वाहून गेल्यास रस्त्याच्या कडेला मोठी खचण होऊन वाहतुकीस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील काही भाग पुराच्या पाण्याच्या प्रभावाखाली येत असल्याने हा धोका अधिक वाढला आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कामात आवश्यक दर्जा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामाची सखोल चौकशी करून भरावाला तातडीने मजबूत पिचिंग करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मुरुमाचा पोकळ भराव; कोट्यवधींचे काम धोक्यात
पुरपट्ट्यातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेला मुरुमाचा भराव पिचिंगअभावी कमकुवत राहिला आहे. आगामी पावसाळ्यात हा भराव वाहून जाण्याची शक्यता असून त्यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान होऊन वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो. वेळेत संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यास कोट्यवधी रुपयांचे काम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.