बिरू व्हसपटे
शिरढोण : पंचगंगा नदीमधून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे शिरढोण, टाकवडे परिसरातील शेतीपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून शेतकरी वर्गात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चेंबर्समधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा रंग काळसर व निळसर असून त्यातून उग्र दुर्गंधी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणेही जिकरीचे ठरत आहे.
दिवसभर सिंचनासाठी येणारे पाणी दूषित असल्याने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड बनू लागल्या असून पिकांचे उत्पादन घटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पायांना इजा होत असून त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत.
शिरढोण परिसरात निर्माण झालेली परिस्थिती ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. दूषित पाण्यामुळे शेती करणे अवघड बनले असून पर्यायी पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.