कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात होताच शिरढोण पुलावर आणि लगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन साचली आहे. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील जलपर्णी हटवून रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीतील जलपर्णीचा मोठा साठा शिरढोण ते तेरवाड परिसरात तुंबून राहिला होता. नदीला आलेल्या पुरामुळे ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहत आली; मात्र पाणीपातळी कमी होताच ती शिरढोण पुलावर, रस्त्यावर तसेच नदीलगतच्या शेतीत मोठ्या प्रमाणात विसावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जलपर्णीचा खच साचला असून पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिरढोण पुलावर साचलेल्या जलपर्णीमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेकडून पुलावरील जलपर्णी हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. मात्र नदीपात्र आणि नदीकाठच्या शेतीत मोठ्या प्रमाणात साचलेली जलपर्णी हटविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
दरवर्षी पुरानंतर जलपर्णीचा प्रश्न अधिक गंभीर होत असून पानिपतळीत वाढ झाल्यानंतर जलपर्णी प्रवाहित होते. मात्र यावेळी जलपर्णी शिरढोण पुलाजवळच विसावली आहे,नदीकाठच्या गावांतील शेतकरी यामुळे त्रस्त आहेत.