Vishalgad Hailstorm Damage
विशाळगड : गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने होरपळणाऱ्या विशाळगड आणि परिसरातील नागरिकांना आज (दि. २७) वळीव पावसाने सुखद धक्का दिला. मात्र, सायंकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या या पावसाने सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे व शेतीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची कौले आणि पत्रे उडून गेली आहेत. विशेषतः या परिसराला वादळी वारा व गारांचा मोठा फटका बसला.
विशाळगड, गजापूर, मुसलमानवाडी, दिवाणबाग, केंबुर्णेवाडी आणि भाततळी परिसरात ढगांच्या गडगडाटासह धुवांधार पाऊस झाला. पांढरेपाणी-पावनखिंड दरम्यान वादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडल्याने रस्ते बंद झाले होते, परिणामी वाहतूक काही काळ ठप्प झाली.
विशाळगड, गजापूर, मुसलमानवाडी, दिवाणबाग, केंबुर्णेवाडी परिसरात मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने आबालवृद्ध यांच्यात कुतूहल निर्माण झाले होते. रस्त्यांवर तसेच घरासमोर गारांचा खच पडला होता. रस्ते, नाले पाण्याने जलमय होऊन ओसंडून वाहत होते. गडावर आलेल्या पर्यटकांची एकच तारांबळ उडाली.