Shahuwadi Diesel shortage affects farming
बांबवडे : खरीप हंगामाची कामे वेगाने सुरू असतानाच ग्रामीण भागात डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतीकामांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. अंतरमशागत, पूर्वमशागत तसेच धुळवाप पेरणीसारखी महत्त्वाची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आणि फवारणी यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने डिझेल हा शेतीसाठी अत्यावश्यक घटक बनला आहे. मात्र पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलजोडीच्या साहाय्याने होत असली तरी काळानुसार बैलांची संख्या कमी झाल्याने शेतकरी पूर्णतः यांत्रिक साधनांवर अवलंबून झाले आहेत. अशा परिस्थितीत डिझेलअभावी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रे बंद पडल्याने नांगरणी, कुळवणी आणि सरी काढणे यांसारखी कामे खोळंबली आहेत.
पावसाचे वातावरण अनुकूल असल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या तयारीत होते. मात्र डिझेल उपलब्ध नसल्याने कामांना विलंब होत असून, धुळवाप पेरणी योग्य वेळेत न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंत्रधारकांनाही या टंचाईचा फटका बसत असून अनेक ट्रॅक्टर चालकांनी कामे थांबवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रांगा वाढत असून डिझेल मिळवण्यासाठी इतर गावांमध्ये जावे लागत असल्याने खर्चही वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामीण भागात डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.