सुनील सकटे
कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील कोल्हापूर-सांगली या अंतरासाठी नव्याने काढलेली निविदा 19 मे रोजी उघडण्यात येणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांनी आर्थिक बिड ओपन करून वर्क ऑर्डर प्रक्रिया गतिमान होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.
चोकाक ते उदगाव-अंकली या रस्त्याच्या कामासाठी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वीच सुमारे 33 किलोमीटरच्या मार्गासाठी एक हजार 850 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याचा प्रश्न 2012 पासून प्रलंबित आहे. हा रस्ता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. या महामार्गावर हातकणंगले येथे उड्डाणपूल, उदगाव येथे कृष्णा नदीवर नव्याने पूल होणार आहे.
33 किलोमीटरसाठी 1 हजार 192.84 कोटीचा निधी मंजूर आहे. 850 कोटी रुपये महामार्ग रुंदीकरणासाठी तर 300 कोटी रुपये भूसंपादनासाठी आहेत. या महामार्ग रुंदीकरणासाठी निविदा काढण्यात आली आहे. 19 मे रोजी निविदा खुली केली होईल. त्यानंतर पंधरा दिवसांनी आर्थिक बिड ओपन होईल. त्यानंतर वर्कऑर्डर प्रक्रिया केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया आणि त्यासाठी लागणार्या कालावधीचा विचार केल्यास पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
द़ृष्टिक्षेपात महामार्ग
एकूण अंतर 33 कि.मी.
11 भुयारी मार्ग
हातकणंगले येथे 900 मीटर लांबीचा पूल.
कृष्णा नदीवर 240 मीटर लांबीचा पूल.
तमदलगे आणि निमशिरगाव (बायपास)