सरूड : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला वरदान ठरलेले चांदोली (वारणा) धरणात २८.१५ टीएमसी (८२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. आज दुपारी १२ वाजता धरणाचे दोन वक्र दरवाजे एक मीटरने उचलून २२०० क्युसेक तसेच विद्युत गृहातून १६०० क्यूसेक, असा एकूण ३ हजार ८०० क्युसेक वेगाने पाणी विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे.
वारणा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून पूर्व सुचनेद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ४८ तासात २५८ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. १७,१५३ क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे. गत तीन दिवसात धरणातील पाणीसाठ्यात ३.५८ टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर धरण व्यवस्थापनाने जलाशय परिचलन सुचीनुसार प्रकल्पाची पाणीपातळी आणि पूर नियंत्रण उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पाणी विसर्ग सुरू केल्याची माहिती प्रकल्पाचे सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी दिली.