गुडाळ : आशिष पाटील
जोरदार अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने राधानगरी तालुक्यात घरांच्या पडझडीची मालिका सुरूच आहे. आज (शुक्रवार) दुपारी खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील सागर कृष्णात खांडेकर यांच्या दुमजली घराची एका बाजूची भिंत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. घरी कोण नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिंडी व्हरवडे येथील मुख्य रस्त्याकडेला सागर खांडेकर यांचे राहते दुमजली घर आहे. आज सकाळी खांडेकर पती-पत्नी शेतात गेले होते, तर शाळेला सुट्टी असल्याने दोन्ही मुले गल्लीत शेजाऱ्यांच्या घरी खेळायला गेली होती.
दुपारी अचानक घराची एका बाजूची पूर्ण भिंत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत खांडेकर यांचे दीड लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तलाठी पी आय गुरव, कोतवाल कुमार कांबळे, मधुकर सावंत यांनी महसूल विभागाच्या वतीने दुर्घटनाग्रस्त घराचा पंचनामा केला.