Radhanagari Dam Discharge 1400 Cusecs
गुडाळ : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आगामी काळात होणारा पाऊस आणि धरणात वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने बुधवारी (दि.२२) सायंकाळपासून धरणातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, सायंकाळपासून बीओटी तत्त्वावरील विद्युतगृहामार्फत सुरुवातीला ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, रात्री १० वाजेपर्यंत तो टप्प्याटप्प्याने वाढवत १,४०० क्युसेकपर्यंत नेण्यात येणार आहे.
यापूर्वी २५ जूनपासून धरणातील विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या खोऱ्यात संभाव्य पूरस्थितीची तीव्रता कमी ठेवण्यासाठी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे भोगावती नदी आधीच दुथडी भरून वाहत असून धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.