Pune Kolhapur National Highway Travel Time 3 Hours
कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर पेठ नाका, पेठ नाका ते सातारा आणि सातारा ते पुणे या रस्त्याची बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन चार ते साडेचार तासांचा कोल्हापूर-पुणे प्रवास अवघ्या तीन तासांवर येईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) च्या कोल्हापूर कार्यालयातील प्रकल्प संचालक संजय एस. कदम यांनी दिली.
इंटिग्रेटेड सेपरेटेड स्ट्रक्चर्सद्वारे पुण्यातील चांदणी चौक जंक्शन विकसित करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावला आहे. पुणे-सातारा 140 कि.मी. रस्त्याच्या सहापदरीकणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीस 2010 ते 2035 या कालावधीसाठी बीओटी तत्त्वावर दिले आहे. हे काम 90 टक्के काम पूर्ण झाले. मात्र शिंदेवाडी उड्डाणपूल, सेवामार्ग, स्ट्रक्चर्स, छोटे पूल अपूर्ण असल्याने एनएचआयने रिलायन्सचा ठेका रद्द करून सर्व कामे स्वत: पूर्ण केली. खेड शिवापूर, शिवरे, हरिश्चंद्री, वेळे या ब्लॅक स्पॉटवरील खेड शिवापूर, शिवरे कामे पूर्ण केली.
वेळे, हरिश्चंद्री ही कामे जूनपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सातारा ते नवले बीज (पुणे) हा प्रवास अवघ्या दीड तासावर येणार आहे. खंबाटकी घाट (नवीन) बोगद्याचे काम पूर्णत्वास आले असून एकेरी वाहतूक सुरू आहे. सहा महिन्यांत पुणे सातारा दुहेरी वाहतूक सुरू होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
पेठ नाका ते कराड या 27 किमी रस्त्याचे काम मे. अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चर्सला 2022 मध्ये दोन वर्षे मुदतीसाठी देण्यात आले.
कराडमधील उड्डणपुलाच्या भूसंपादनास विलंब, ठिकठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्गांची मागणी आणि मुख्य ठेकेदार आणि उपठेकेदार यांच्यातील वादामुळे 15 महिने हे काम रखडले, असे सांगून कदम म्हणाले, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गावकऱ्यांच्या मागणीनुसार ऑगस्ट 2025 मध्ये बोरगाव, नागठाणे, अतीत, काशिळ आणि तिसराळे भुयारी मार्ग मंजूर करून ठेकेदारांत समेट घडविल्याने 80 टक्के काम पूर्ण असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. कराड उड्डााणपुलाचे काम जूनपर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
पेठ नाका-कोल्हापूर या 45 किमी रस्त्याचे काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि. या कंपनीकडे आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम एक वर्ष संथ गतीने झाले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराची कोल्हापुरी भाषेत कानउघाडणी केल्याने जानेवारी 2026 मध्ये काम सुरू झाले. गावकऱ्यांच्या मागणीनुसार महामार्ग ओलांडण्यासाठी कणेगाव, किणी, मंगरायाचीवाडी, शिरोली, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव या ठिकाणी अतिरिक्त भुयारी मार्ग मंजूर झाले. ही सर्व कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचचे नियोजन असल्याचे कदम यांनी सांगितले.