राशिवडे (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : राजकारणामध्ये काहीही घडू शकते याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा आला. करवीर विधानसभा मतदारसंघामधील पारंपरिक राजकीय विरोधक काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आणि शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे भोगावती कारखाना निवडणुकीसाठी एकत्र आल्याने या दोन सडोलीकरांमधील राजकीय संघर्षाला ३४ वर्षांनंतर पूर्णविराम मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
सडोली खालसा (ता.करवीर) येथील काँग्रेसचे पी. एन. पाटील आणि शेकापचे संपतराव पवार-पाटील यांच्यातील राजकीय विरोध संपूर्ण जिल्ह्यांने पाहीला आहे. अगदी ग्रा.पं. निवडणुकीच्या राजकारणापासून ते विधानसभा, गोकुळ दुध संघ, जिल्हा बँकेतील राजकीय संघर्ष टोकाचा निर्माण झाला होता. गेल्या चार विधानसभा निवडणुकीवेळी हा राजकीय संघर्ष ईरेलाच पोहोचला होता. परंतु 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी हा राजकीय संघर्ष कमी करण्याच्या हेतूने आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी क्रांतीसिंह पवार-पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर सलोख्याच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला. आता तर भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती बिनविरोधसाठी कुणाचेच वावडे नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा या दोन पारंपारिक घराण्याच्या सलोख्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतीसिह आणि अशोकराव पवार-पाटील यांचे चिरंजीव अक्षय पवार-पाटील यांनी राजकीय सलोखा कायम ठेवत भोगावतीसाठी पी. एन. पाटील यांच्यासोबत युती करून 34 वर्षांच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम दिला. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शेकापचे केरबा भाऊ पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली.
जुन्या करवीर तालुक्यामध्ये पी.एन आणि संपतराव पवार यांचेच दोन प्रबळ गट आहेत. आता हे दोन गट एकत्र आल्याने राजकीय वातावरण बदलले आहे. आगामी जि.प, पं.स, निवडणुकांवरही याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.