Andolan Ankush Shirdhon Meeting
शिरढोण : पंचगंगा नदीच्या प्रदूषणाविरोधात आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शिरढोण येथे रविवारी सायंकाळी जागर सभा घेण्यात आली. ३ जूनरोजी कुरुंदवाड येथे होणाऱ्या इचलकरंजी पाणीबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा झाली.
सभेचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास बालिघाटे यांनी केले. जिल्हाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, “गेली अनेक वर्षे पंचगंगा प्रदूषणामुळे शिरोळ तालुका होरपळत आहे. गावोगावी साथीचे रोग व कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे शेतजमिनी नापीक होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रोसेसधारक कायद्याला हरताळ फासत सांडपाणी नदीत सोडत आहेत. प्रशासनाला जाग आणण्यासाठी नाईलाजाने पाणीबंद आंदोलन करावे लागत आहे.”
धनाजी चुडमुंगे यांनी, “मुठभर प्रोसेस मालक जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. पंचगंगा शुद्धीसाठी ३ जूनच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन केले.
यावेळी राकेश जगदाळे, नागेश काळे, अविनाश पाटील, विश्वास बालीघाटे,अमोल गावडे यांची भाषणे झाली. सभेला विद्याधर मगदूम, रशिद मुल्ला, एकनाथ माने, प्रमोद नाईक, शिवाजी काळे, शाहीर बाणदार, पप्पू मुंगळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मूठभर प्रोसेसधारक आपल्या स्वार्थासाठी पंचगंगा नदी प्रदूषित करत आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना