Krishna Water Scheme closure threat
कुरुंदवाड : पंचगंगा नदीत काळ्या ओढ्यातून सोडले जाणारे प्रदूषित पाणी तात्काळ बंद करावे, या मागणीसंदर्भात २७ एप्रिलरोजी इचलकरंजी प्रांत कार्यालयात होणाऱ्या सुनावणीत ठोस निर्णय न झाल्यास १ मेपासून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा पाणी योजनेचा पुरवठा रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चूडमुंगे यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तालुक्यातील नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. इचलकरंजी येथील सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराबाबत संबंधित यंत्रणा जबाबदारी पार पाडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काळ्या ओढ्याचा प्रवाह रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.
या प्रदूषणाचा परिणाम नदीकाठच्या गावांतील पिण्याचे पाणी, शेती, जनावरे आणि पर्यावरणावर होत असल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा कृष्णा पाणी योजना बंद करून तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
दरम्यान, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा विश्वास बालीघाटे यांनी दिला.
यावेळी राकेश जगदाळे, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, दीपक पाटील, प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, बंडू बरगाले, आयुब पट्टेकरी, एकनाथ माने आदी उपस्थित होते.