panchganga river pollution 
कोल्हापूर

Panchaganga River | पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी निर्णायक लढ्याची गरज

दूषित पाण्याने ग्रामीण आरोग्य धोक्यात; जनआंदोलनाची हाक...

पुढारी वृत्तसेवा

बिरू व्हसपटे

शिरढोण : पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात आता निर्णायक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली असून ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे नदीकाठावरील गावांना दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वच्छ पाण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच असल्याने प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर वाढत आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी जबाबदार यंत्रणांकडून केवळ दिखाऊ कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. काळेकुट्ट, विना प्रक्रिया सांडपाणी थेट नदीत सोडले जात असून त्यामुळे नदीतील ऑक्सिजन पातळी घटत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत आणि शेतीवरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

आंदोलनांनंतर केवळ पंचनामे करून प्रकरणे दडपली जात असल्याची भावना नागरिकांत आहे. ‘कारणे दाखवा’ नोटिसांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रदूषण करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव, शून्य विसर्जन धोरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे केवळ कागदावरच राहिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची मागणी जोर धरत आहे. शासन आणि संबंधित यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आता लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत निर्णायक लढा उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT