अडकूर : अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत चंदगड तालुक्यातील अडकूर येथे एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या पवित्र वातावरणात ग्रामस्थांना आता 'स्मार्ट मीटर'चे धडे मिळाले आहेत. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. विठ्ठल परमेश्वर फाड महाराज यांनी आपल्या प्रवचनातून स्मार्ट मीटरचे महत्त्व पटवून देत प्रबोधन केले.
दरवर्षीप्रमाणे अडकूरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी शेकडो भाविक जमले होते. या धार्मिक व्यासपीठाचा प्रभावी वापर करत फाड महाराजांनी स्मार्ट मीटरबाबत समाजात असलेले गैरसमज दूर केले. "स्मार्ट मीटर म्हणजे वीज बिलिंगमधील पारदर्शकता आणि न्याय्यतेकडे जाणारे पाऊल आहे," अशा शब्दांत त्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले.
अचूकता आणि वेळेवर बिलिंग ही स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये आहेत. ग्रामीण भागातील कुटुंबांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःच्या वीज बिलावर नियंत्रण मिळवावे.— ह.भ.प. विठ्ठल परमेश्वर फाड महाराज
अचूक बिलिंग : पारंपारिक मीटरच्या तुलनेत यात मानवी चुकांना वाव नाही. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार.
वापरावर नियंत्रण : ग्राहकांना आपल्या वीज वापराचा 'रिअल-टाइम' डेटा मिळणार असल्याने ऊर्जेची बचत करणे सोपे होईल.
सौर ऊर्जेची सवलत : सौर ऊर्जेच्या उपलब्धतेच्या काळात वीज वापरल्यास ग्राहकांना सवलतीच्या दराचा लाभ घेता येईल, ज्यामुळे महिन्याचा खर्च कमी होईल.
विश्वासार्हता : यामुळे ग्राहक आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.
धार्मिक आणि सांस्कृतिक व्यासपीठावरून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. कठीण तांत्रिक विषय सोप्या भाषेत आणि विश्वासार्ह व्यक्तीकडून समजल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अध्यात्म आणि समाजहित यांचा हा संगम चंदगड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.