कवठेगुलंदः आलास ता. शिरोळ काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने आलास गावात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई केली होती. मात्र, या कारवाईचा गैरफायदा घेणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या घटकांवर कोणताही फरक पडलेला नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खव्याची विक्री सुरू असून, दरपत्रकातील तफावतीमुळे हा प्रकार उघडकीस येत आहे.
सध्या आलास परिसरातील बाजारात खव्याच्या किमतीत कमालीची तफावत पाहायला मिळत आहे. अवघ्या १८० रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. अस्सल दुधापासून तयार केलेल्या शुद्ध खव्याची किंमत मात्र ३०० रुपये प्रति किलो एवढी आहे.
कमी किमतीत मिळणाऱ्या खव्यामध्ये वनस्पती तूप, बटाटा, स्टार्च आणि घातक रसायनांची भेसळ केली जात असल्याचा संशय जाणकारांनी व्यक्त केला आहे. निव्वळ नफा कमावण्याच्या उद्देशाने ग्राहकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे.
कारवाईचा धाक संपला?
प्रशासनाने केलेल्या मागील कारवाईनंतर काही काळ या अवैध धंद्याला चाप बसला होता. परंतु, प्रशासनाचा डोळा चुकवून काही व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने खव्याची मागणी वाढणार आहे, आणि नेमका याच संधीचा फायदा हे भेसळबहाद्दर घेत आहेत.
"केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर अशा भेसळखोरांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. १८० रुपयांत मिळणारा खवा हा थेट आरोग्याला धोका निर्माण करत आहे. अशा केमिकल आणि वनस्पती तूपयुक्त खव्याच्या सेवनामुळे पोटदुखी, अन्नातून विषबाधा आणि दीर्घकाळ वापरामुळे यकृत व किडनीचे गंभीर आजार होऊ शकतात.
या प्रकारानंतर आता अन्न व औषध प्रशासन पुन्हा एकदा याकडे गांभीर्याने पाहून कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आलास गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांनीही आरोग्याशी तडजोड न करता, केवळ स्वस्त मिळतो म्हणून अशा संशयास्पद खव्याची खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
आरोग्य धोक्यात; नागरिकांमध्ये संताप
कमी किमतीत मिळणाऱ्या या खव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल आणि पाम ऑइलचा वापर केला जातो. हा खवा खाल्ल्याने पोटविकार, अन्नातून विषबाधा आणि लिव्हरचे गंभीर आजार होण्याचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाची कारवाई होऊनही जर विक्री जोरात सुरू असेल, तर यामध्ये काही अधिकाऱ्यांचे अभय आहे का? असा संतप्त सवाल आता आलास सह सात गावातील नागरिक विचारत आहेत. आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून व्यापाऱ्यांची थेट दुकाने सील करण्याची आणि कठोर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.