शिरढोण : (ता. शिरोळ) येथील सांडपाणी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असतानाही संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला खीळ बसत असल्याचा आरोप होत असून शेतकरी संतप्त झाले आहेत.
प्रकल्पातून शुद्ध होणारे पाणी थेट पंचगंगा नदीत सोडावे अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे. तसेच अन्य काही शंका व गैरसमज असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करण्याची गरज असतानाही शिरोळ येथील संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्याच्या समस्येमुळे शिरढोण परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अधिकारीच उदासीन भूमिका घेत असल्याने परिस्थिती आणखी चिघळत आहे. शेतकऱ्यांच्या शंका दूर न करता प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, काही अधिकारी मुद्दामहून जागेवर येण्याचे टाळत असून त्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप होत आहे. ही भूमिका संशयास्पद असून प्रकल्पाला खोडा घालण्याचा प्रयत्न असल्याचा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. सांडपाणी प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.चौकट
प्रकल्पाबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत.यातून शुद्ध होऊन येणारे पाणी थेट बांधीव नाल्यामार्फत नदीला सोडण्यात यावे.या पाण्यामुळे कोणाच्या शेतीला धोका निर्माण होता कामा नाही.आमचा प्रकल्पाला विरोध नाही संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन करावे. मात्र अधिकारी येण्यास टाळाटाळ करत आहेत.शेतकरी, शशिकांत चौधरी शिरढोण