शिरढोण : येथील ग्रामपंचायतीच्या विशेष गावसभेत जलजीवन मिशनच्या अर्धवट अवस्थेत बंद पडलेल्या कामावरून ग्रामस्थ, तक्रारदार आणि प्रशासन यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. चुकीच्या जागेवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले असून संबंधितांना टक्केवारी मिळाली नसल्यानेच काम बंद पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी रस्ते अतिक्रमण आणि अनियमित पाणी पुरवठा यावरून नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनानाला धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली.यावेळी वातावरण तणाव पूर्ण बनले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा प्रशासक सागर भंडारे होते.
गेल्या तीन वर्षांपासून गावातील माळभागात कुमार विद्या मंदिर शाळेच्या आवारात जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. मात्र जागेची निवड चुकीची असून बांधकामाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे आरोपामुळे हे काम अर्धवट अवस्थेत बंद पडून आहे. या प्रकरणाची तालुका व जिल्हास्तरावर विचारणा सुरू असल्याने सरपंच तथा प्रशासक सागर भंडारे यांनी विशेष गावसभा बोलावली होती. जलजीवनच्या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. रस्ते, अतिक्रमण, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरूनही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभेत वारंवार गोंधळ निर्माण झाला.
संबंधित टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल गावसभेसमोर ठेवावा. त्यानंतरच काम सुरू ठेवायचे की अन्यत्र हलवायचे याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर त्यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. गोंधळाच्या वातावरणातच गावसभा आटोपती घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक विराज जथ्थे, शक्ती पाटील, शाहीर बाणदार, विजय सूर्यवंशी, जब्बार नालबंद, भास्कर चौगुले, विलास सासणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.