कवठेगुलंद : गेल्या तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पाणी वाढल्याने राजापूर बंधारा चालू हंगामात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. सध्या या बंधाऱ्यावरून ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटकच्या दिशेने सुरू असून, येथील पाणी पातळी १७ फुटांवर पोहोचली आहे.
मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने आणि कडक ऊन पडल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. सोयाबीन, भुईमूग, मूग आणि उडीद यांसारख्या नगदी पिकांना या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. या पावसामुळे पिके पिवळी पडण्यापासून वाचली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी नव्या लागवडीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आता जमीन ओली झाल्याने रखडलेल्या ऊस लागवडीच्या कामांना वेग येणार आहे.