कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांमध्ये ग्राईंडर वापर, गळती, शिलालेखांकडे दुर्लक्ष, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव या गंभीर बाबी समाेर आल्या आहेत. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात राज्य पुरातत्त्व विभागाचा बेफिकीरपणा सुरू आहे, असा आक्षेप सामाजिक संघटना व इतिहास अभ्यासकांनी घेतला.
मंदिराच्या छतातून पाणी गळती, दगडी स्थापत्यावर ग्राईंडर, यांत्रिक घर्षण साधने व हातोड्यांचा वापर होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी मंगळवारी (दि. १४) मंदिरात पाहणी केली. मूळ दगडी पृष्ठभाग, शिल्पांकन आणि कोरीव स्थापत्याला यांत्रिक प्रक्रियांमुळे हानी होण्याची भीती व्यक्त केली. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन देवस्थान समितीला देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह ठेकेदार विक्रम राठोड, अमोल पाटणकर, सुरेश पाटील उपस्थित होते.
गरुड मंडपाच्या ८ खांबांनाही तडे
पाहणीनंतर संघटनेने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदविली. मातृलिंगावरील मुख्य शिखराला गळती लागली असून, शिलालेखांच्या संरक्षणासाठी पुरेशी उपाययोजना नसल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. गरुड मंडपातील आठ खांबांना तडे गेल्याचेही यावेळी देवस्थानच्या निदर्शनास आणून दिले.