कोल्हापूर : आधीच वाढती महागाई, घरगुती खर्च, वीज बिल, मालमत्ता कर आणि इतर करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य नागरिकांवर आता पाणीपट्टी दरवाढीचा आणखी एक आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘जनतेसाठी सत्ता’ या घोषणांवर विश्वास ठेवून महायुतीला कौल देणाऱ्या कोल्हापूरकरांना हा मोठा धक्का आहे. परिणामी, महायुती पाणीपट्टी दरवाढ करून कोल्हापूरकरांना झटका देणार की, प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून दिलासा देणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांसाठी 10 टक्के, व्यावसायिकांसाठी 15 टक्के आणि उद्योजक नळ कनेक्शनधारकांसाठी तब्बल 20 टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने सुचविला आहे. स्थायी समितीकडून हा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या दरवाढीतून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली असली, तरी त्याची किंमत मात्र कोल्हापूरकरांना मोजावी लागणार आहे. दरम्यान, याबरोबरच महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या कर वाढीचे प्रस्तावही मंजुरीसाठी सभेपुढे ठेवले आहेत. तसेच, काही नगरसेवकांनी महापालिकेचे दुकानगाळे, खुल्या जागा, इमारती, केबिन यांच्याबाबत अभय योजना लागू करा, नळ कनेक्शनसाठी खोदाई दर जुन्या दरानेच घ्यावेत, यासह इतर ठराव दाखल केले आहेत.