Kolhapur Funds Shortage Housing
आनंदा केसरे
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अत्यंत गरीब, गरजू आणि बेघर कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने शासनाने 'मोदी आवास घरकुल योजना' अंमलात आणली. या योजनेअंतर्गत गेल्या वर्षा कोल्हापूर जिल्ह्यात हजारो पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष निधीचा पत्ता नसल्याने ही अत्यंत महत्त्वाची घरकुल योजना सध्या पूर्णपणे रेंगाळली आहे.
गेल्या वर्षांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून हजारो गोरगरीब लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड झाली. अनेक लाभार्थ्यांना प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी पत्रेही वाटप करण्यात आली. त्यामुळे लवकरच हक्काचे पक्के छत मिळेल, या आशेने अनेक लाभार्थ्यांनी आपली जुनी कच्ची घरे पाडून टाकली, तर काहींनी पायाभरणीचे प्राथमिक काम सुरू केले. मात्र, शासनाकडून पुढील हप्त्यांचा निधी उपलब्ध न झाल्याने बहुतांश घरांची कामे अर्ध्यावरच खोळंबली आहेत.
निधीअभावी कामे रखडल्यामुळे घरकुलधारकांची मोठी अडचण होत आहे. तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये किंवा भाड्याच्या घरात राहताना या कुटुंबांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. वाढती महागाई आणि त्यातच घराचे काम अर्धवट राहिल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
"घर मंजूर झाल्याचे यादी तालुक्याच्या ठिकाणी आली आहे , पण वर्षे झाली तरी खात्यावर निधी जमा झालेला नाही. जुने घर पाडल्यामुळे आता तात्पुरत्या निवाऱ्यात राहावे लागत आहे. शासनाने आमची ही अवस्था ओळखून लवकरात लवकर निधी द्यावा."अशी मागणी लाभार्थी वर्गातून होत आहे.