Fox Rescued from Well Amba
विशाळगड : विशाळगड-आंबा मार्गांवर रात्रीच्या अंधारात महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना, वाहनांच्या आणि मानवी वस्तीच्या भीतीने सैरावैरा धावणारा एक दोन वर्षांचा कोल्हा आंबा येथील आंबा टॅनिन कंपनीच्या विहिरीत कोसळला. सुदैवाने, मलकापूर वनपरिक्षेत्र विभागाच्या बचाव पथकाने वेळेवर धाव घेत या कोल्ह्याला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
विशाळगड जंगलातून बाहेर पडलेला हा कोल्हा महामार्ग ओलांडत असताना समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतामुळे आणि आवाजामुळे बिथरला होता. याच धावपळीत आंबा टॅनिन कंपनीच्या परिसरातील एका विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने कोल्ह्याचा अंदाज चुकला आणि तो थेट खोल विहिरीत पडला. विहिरीत असलेल्या एका बाजूच्या बोगद्याचा आधार मिळाल्याने तो रात्रभर तिथेच अडकून पडला होता.
आज दुपारी विहिरीत कोल्हा असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक आफरीन देवळेकर व हरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. विहिरीची खोली लक्षात घेऊन पथकाने 'जाळीची झोळी' तयार केली आणि ती विहिरीत सोडली. अथक प्रयत्नांनंतर या कोल्ह्याला सुरक्षितपणे जाळीत पकडून वर काढण्यात आले.
विहिरीबाहेर काढल्यानंतर कोल्ह्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तो दोन वर्षांचा असून पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्ट होताच, त्याला नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्यात आले. पिंजऱ्यातून बाहेर पडताच या कोल्ह्याने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
या मोहिमेत रोहित पाटील, शिवाजी पाटील आणि तुकाराम थोरवी यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे, याच पथकाने गेल्या २४ फेब्रुवारी रोजी देखील शित्तूर मलकापूर येथे विहिरीत पडलेल्या एका वन्यप्राण्याचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिसरातील विहिरींना संरक्षक कठडे नसल्यामुळे वन्यप्राणी अपघाताला बळी पडत आहेत. नागरिकांनी आपल्या विहिरींना जाळी किंवा कठडे बसवून घ्यावेत जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.