कोल्हापूर : ‘पुणे आणि मुंबईनंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कोल्हापूरमध्ये मोठी क्षमता आहे. शेंडा पार्क येथे साकारणारे आयटी पार्क हे केवळ शहरासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या इतर 35 पार्क्ससाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. शेंडा पार्क आयटी पार्कला अधिकृत शासन निर्णय प्राप्त झाल्याबद्दल ‘आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर’तर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूरला जागतिक स्तरावरील आयटी हब बनवण्यासाठी शासन कालबद्ध योजना तयार करणार आहे. यासाठी स्थानिक आयटी तज्ज्ञांनी त्यांच्या गरजांचा सविस्तर अहवाल सादर करावा, त्यावर शासन तातडीने अंमलबजावणी करेल.
स्थानिक उद्योजकांना प्राधान्य
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरातील 500 हून अधिक स्थानिक कंपन्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय 11 हजार रोजगार निर्माण केले आहेत. या स्थानिक उद्योजकांना आयटी पार्कमध्ये जागा मिळवून देण्यासाठी एमआयडीसीच्या नियमांत बदल करावे लागले, तर त्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे. बाहेरील मोठ्या कंपन्यांपेक्षा इथल्या मातीतील स्टार्टअप्सना बळ देणे ही आमची प्राथमिकता असेल. सोहळ्यात पालकमंत्री आबिटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, आयटी असो.चे पदाधिकारी, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
2035 पर्यंत 70 हजार रोजगारांचे उद्दिष्ट
असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि सचिव राहुल मेंच यांनी सादरीकरणाद्वारे कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राचे सामर्थ्य मांडले. कोल्हापूर हे सध्या राज्यातील चौथ्या क्रमांकाचे आयटी केंद्र असून, 2035 पर्यंत येथे 70 हजार उच्चशिक्षित रोजगार आणि 9,500 कोटींची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट ‘आयटॅक’ने ठेवले आहे. त्यासाठी स्टार्टअप इकोसिस्टीम आणि आवश्यक पायाभूत सुविधांची मागणी त्यांनी केली.