पुढारी ऑनलाईन डेस्क : मृतदेहाच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी न झाल्याने मृतदेह पुन्हा रुग्णालयाकडे नेण्यात आल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांमधील समन्वयातील गोंधळ समोर आला. अंत्यविधीसाठी घाटावर जात असलेली शववाहिका पोलिसांनी थांबवली आणि.तांत्रिक अडथळ्यामुळे इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अंत्यविधी थांबवला. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. (Kolhapur News)
इचलकरंजीत पोलिसांकडून झालेल्या तांत्रिक अडथळ्यामुळे अंत्यविधी थांबवण्यात आल्याची घटना घडलीये. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत विशाल आप्पासो लोकरे याचा शुक्रवारी खून करण्यात आला होता. विशालचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह नेला जात असताना, गावभाग पोलिसांनी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी न झाल्याची बाब लक्षात घेतली. (Kolhapur News)
त्यामुळे अंत्यविधीसाठी जात असलेल्या शववाहिकेला अडवून मृतदेह पुन्हा इंदिरा गांधी रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, तिथे नमुने घेण्यास नकार दिल्याने शववाहिका पुन्हा सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलीये.. या गोंधळामुळे नातेवाईकांना घरातील नागरिकांची वाट पाहत आणि नदीकाठावर अंत्यविधीची तयारी करत, मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. यामुळे प्रशासनाच्या तांत्रिक गोंधळावर दिवसभर शहरात चर्चा रंगली. या घटनेने आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Kolhapur News)