सुनील कदम
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग कामात अनेक गावांमधील देवरायांचा बळी गेला आहे. त्याबद्दल निसर्गप्रेमी आणि पर्यावरणतज्ज्ञांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देवराई म्हणजे त्या भागातील ग्रामदैवतांच्या नावे राखून ठेवलेले राखीव जंगल! देवरायांमध्ये बहुतेक सगळ्या प्रकारच्या वनस्पती एकाच ठिकाणी आढळतात. चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी असल्याने शेकडो वर्षांपासून अशा देवरायांना संरक्षण मिळाले आहे. काळाच्या ओघात बहुतेक देवराया लयाला गेल्या असल्या, तरी राज्यात आजघडीला जवळपास 3,200 देवराया असून, त्यापैकी तब्बल 1,700 देवराया या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आहेत.
जैवविविधता धोक्यात
महामार्गाचे काम होत असताना प्रामुख्याने शाहूवाडी तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवरायांचा बळी गेलेला दिसतो. प्रामुख्याने गावालगतच असल्याने महामार्गाच्या कामात अनेक देवरायांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. यामुळे जैवविविधताही लयाला गेलेली आहे. देवराया नष्ट झाल्यामुळे प्राणी-पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात आला आहे. त्यांचे अन्यत्र स्थलांतर झालेले आहे.
देवराया टिकविण्याची गरज
शासनाने अशा देवराया पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावालगत वन खात्याची, महसूल विभागाची पडजमिन त्या त्या भागातील ग्रामपंचायतींच्या हवाली करून देवरायांची पुनर्लागवड करण्यासाठी शासकीय अनुदान देऊन या देवराया पुन्हा उभा करण्याची गरज आहे.