कोल्हापूर, दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्या बालिंगा उपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाले. दगडी पाटात अत्याधुनिक पद्धतीचे पाईप घालून त्यावरील चेंबरवर सिमेंट काँक्रिटचे थर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री जॅकवेलमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी आले. परिणामी, बुधवारी कमी दाबाने सुरू असलेला पाणीपुरवठा गुरुवारपासून उच्च दाबाने सुरू होणार आहे, अशी माहिती महापालिका अधिकार्यांनी दिली.
भोगावती नदीवर बालिंगा उपसा केंद्र आहे. या केंद्रातून शहरातील गावठाण भागात पाणीपुरवठा होतो. त्यासाठी उपसा केंद्रातील 300 हॉर्सपॉवरचे दोन, 200 हॉर्सपॉवरचे एक आणि 150 हॉर्सपॉवरचा 1 असे पंप आहेत. नदीतील पाणी सुमारे 50 फूट खोल असलेल्या दगडी पाटातून जॅकवेलमध्ये येत होते. परंतु, चेंबर कोसळल्याने त्याचे दगड पाटात पडून चोकअप झाले होते. आता काम पूर्ण झाल्याने पाईपमधून जॅकवेलमध्ये पाणी येत आहे. त्यामुळे गुरूवारी उपसा केंद्रातली सर्वच पंप सुरू केले जाणार आहेत. बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या भागातील पाणी पुववठा पूर्ववत सुरळीत होईल.
बालिंगा उपसा केंद्रे ते भोगावती नदी या दरम्यानच्या दगडी पाट व चेंबरचे काम 2 नोव्हेंबरपासून सुरू होते. दोन दिवसापूर्वी चेंबर कोसळल्यानंतर पोकलँड व जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले. बुधवारीही युध्दपातळीवर काम सुरू होते. रात्रभर अधिकारी, कर्मचारी आणि मजूर थांबून होते. यावेळी जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, उपजल अभियंता जयेश जाधव, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मेकॅनिकलचे जे एस जाधव, ड्रेनेज उप जलअभियंता भेटेकर, अरविंद यादव व कॉन्ट्रॅक्टर, 15 मजूर तसेच महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. अग्निशमन दलही तळ ठोकून आहे.