सरवडे: राधानगरी तालुक्यातील सरवडे आणि मालवे हद्दीत सकाळी पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक हल्ला चढवत शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. शेतामध्ये पेंडी उचलणे, भांगलन व अन्य शेतीची कामे सुरू असताना कोल्ह्याने एकामागोमाग अनेकांवर झडप घालत हल्ला केल्याने पाच शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.पिसाळलेल्या कोल्ह्याच्या या हल्ल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे.
या घटनेत निवृत्ती दत्तात्रय वाईगडे,उज्ज्वला अशोक काळुगडे (रा.सरवडे),तर सौ. नंदा निवास पाटील, निवास पांडुरंग पाटील आणि बळवंत ज्ञानदेव पाटील (सर्व.मालवे) हे गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. जखमींनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोल्ह्याच्या आक्रमकतेमुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी जखमींना तातडीने सोळांकूर आणि मुरगुड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकान्यांकडून आवश्यक ते उपचार केले जात आहेत.
दरम्यान, जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसून थेट नागरिकांवर हल्ला करत असल्याने सरवडे, मालवे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे सुरू असताना अशा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या गंभीर घटनेची दखल घेऊन वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत अत्यावश्यक पथक पाठवून संबंधित कोल्ह्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे