कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज शुक्रवारी (दि.२६ जुलै) २ लाख ६६ हजार ५८६ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी कोल्हापुरातील पाणी पातळी वाढतच (Kolhapur Flood Updates) आहे. दरम्यान, कोल्हापुरात पंचगंगा नदीने काल गुरुवारीच धोका पातळी ओलांडली होती. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४४ फूट ९ इंच इतकी होती. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
अलमट्टी धरण येथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, धरणातून २ लाख ६६ हजार ५८६ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. हा विसर्ग या आधी २ लाख ७५ हजार क्युसेक इतका होता.
अलमट्टी धरण हे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीतवर होतो, त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गाकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष असते. कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी केलेली होती.