विशाळगड
सुभाष पाटील : "चातकासारखी आर्त साद घालणारा शेतकरी राजा आज आभाळाकडे डोळे लावून बसलाय... 'रोहिणी' तर कोरडी गेलीच, पण आता 'मृग' नक्षत्रानेही पाठ फिरवल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे." जून महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता निसर्गाला आर्त साद घालत आहे.
यंदा २५ मे रोजी हत्तीच्या वाहनावर आरूढ होऊन आलेल्या रोहिणी नक्षत्राकडून मुसळधार पावसाची अपेक्षा होती. मात्र, ७ जूनपर्यंत हे नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यानंतर ८ जूनला बेडकाच्या वाहनावर सुरू झालेल्या मृग नक्षत्राकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु हे नक्षत्रही निम्मे सरले तरी पावसाने केवळ हुलकावणीच दिली आहे. हे २१ जूनपर्यंत असणार आहे.
‘बरस रे घणा...’ आर्जवी साद
विहिरींनी तळ गाठला आहे आणि धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. आता सगळी भिस्त वरुणराजाच्या कृपेवर आहे. आता महागडी बियाणे आणि खतांचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, "बरस रे घणा, एकदाचा बरस आणि माझ्या काळ्या आईची तहान भागव!" अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहे."
"लेकराप्रमाणे काळजी...!" शिवारात चिंतेचे ढग
सुरुवातीच्या किरकोळ सरींवर शेतकऱ्यांनी भाताची धूळवाफ पेरणी केली होती. मात्र, आता कडक उन्हामुळे ही कोवळी रोपे करपू लागली आहेत. ही रोपे जळून खाक होऊ नयेत म्हणून शेतकरी उपलब्ध विहिरीच्या किंवा टँकरच्या पाण्याने घागर-घागर पाणी आणून, आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे या रोपांना जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.