कोल्हापूर : जिल्ह्यात दैनंदिन मागणीएवढा गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध असून, गॅसटंचाई होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. यावेळी नियम न पाळणाऱ्या गॅस एजन्सींवर कारवाई करा, असे आदेशही मंत्री आबिटकर यांनी दिले.
जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुरवठा विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हापुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण म्हणाल्या, जिल्ह्यात 112 एजन्सी आहेत. तर साडेअकरा लाख घरगुती गॅस ग््रााहक आहे. 65 हजार सिलिंडर उपलब्ध आहेत. रोज सिलिंडरची आवक सुरू आहे. आयओसी या कंपनीची समस्या आहे. तर काही मोजक्या गॅस एजन्सीबाबत तक्रारी आहेत. आता घरगुती गॅस वितरण स्थिती सुधारली असून, दोन दिवसांत ही परिस्थिती सुरळीत होईल.
कमर्शियल पुरवठा बंद होता. तो आता सुरू केला आहे. नवीन आदेशानुसार सार्वजनिक सेवांमधील वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शासकीय कँटीन या घटकांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. तर औषध उत्पादकांसह अन्य घटकांना 50 टक्के पुरवठा करण्यात येणार आहे. कमर्शियल पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश दिले. बैठकीस आमदार अशोकराव माने, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.